माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Tuesday 18 April 2017

पर्यावरण रक्षणासाठी उद्याचे ' दिपक 'व्हावे !

 🔹पर्यावरण रक्षणासाठी उद्याचे ' दिपक 'व्हावे !🔹

    लेखन :-- शंकर चौरे  (पिंपळनेर)धुळे
                     ☆ ९४२२७३६७७५ ☆
   मित्राने, या पृथ्वीवर आपण आज मोठय़ा
आनंदाने राहत आहोत. चैतन्य, सौंदर्य,समृद्धी,
सुंदरता.... इतकेच नव्हे, तर स्वर्गसुखच या
भूतलावर अवतरले. माणसाचे जीवन पिढ्या-
पिढ्या उमलू लागले; वस्त्या फुलू लागल्या.
विकासाचे चक्र गतीने फिरू लागले.पुढे पुढे
ही गती अधिकच वाढली; अनियंत्रित झाली.
त्यातून पर्यावरणाच्या समस्यांचा डोंगर उभा
राहिला.
   या पर्यावरण समस्यांकडे डोळेझाक केल्यास
त्या अधिकच तीव्र बनण्याची शक्यता नाकारता
येत नाही. पर्यावरण समस्या आणि त्यातून
उद्भवणाऱ्या भीतीदायक भविष्याताची धोक्याची
सूचना आहे का ?माणसाच्या स्वार्थात पर्यावरणा
-ची आहुती तर पडणार नाही ना ? परिस्थिती
नुसतीच कठीण आहे की भयावह आहे.
साडेचार अब्ज वर्षांचा इतिहास असलेल्या या
वसुंधरेच्या माणसाच्या फक्त १०० -१५०
वर्षातील उद्योगांनमुळे नाश तर होणार नाही ना ?
पर्यावरणाची सर्वत्र हानी होत असलेल्या या
समस्येवर खरच काहीच उपाय नाही का  ?
     सगळीकडे आशेचे दीप मंदावत असताना,
जगाच्या काही कोपर्‍यात मात्र काही मिणमिणते
दिवे हा अंध:कार निकराच्या प्रयत्नाने दूर करत
आहेत .
    पर्यावरण रक्षणाचे व्रत घेतलेले आणि त्याचा
ध्यास असलेले मोजकेच लोक आपापल्या परीने
या कार्यात खारीचा वाटा उचलत आहेत. जगाने
वेडे ठरवलेले असे काही जण आपल्या आजू-
बाजूसही असतात. काही जण आपल्या दैनंदिन
जीवनात फक्त पाठकोरे कागदच वापरतात ;
तर काही जण प्लास्टिकचा वापर कटाक्षाने
टाळतात. गाडी घ्यायची ऐपत असूनही काही
जण आयुष्यभर सायकलच वापरतात; तर
काहीजण देवासाठी नव्हे, तर निसर्गासाठी
एक दिवस खराखुरा उपवास करतात.आपल्याला
वेड्यासारखे भासणारे हे लोक त्यांचा मार्ग
अत्यंत शहाणपणाने स्वीकारता.
   वैयक्तिक स्तरावरील हे प्रयत्न कधीतरी सांघिक
स्वरूपही घेतात. मेधा पाटकरांचे 'नर्मदा बचाव
आंदोलन ' एकत्रित ग्रामीण विकासाच्या कल्पने-
वर आधारित अण्णा हजारे यांची आदर्श गाव
योजना, धुळे जिल्ह्य़ातील साक्री तालुक्यात
बारीपाडा या गावात चैत्राम पवार या आदिवासी
युवकाने  ' जंगल रक्षणासाठी चालवलेली मोहीम
आदी सारे आपापल्या परीने झटत आहेत.
या सर्व आंदोलनांना मिळालेल्या यशापशापेक्षा,
पर्यावरणाचा विषय ऐरणीवर येऊन लोकजागृती
केल्याचे त्यांचे योगदान अंत्यत महत्वाचे आहे.
     पर्यावरणाचा आवाका पाहता हे प्रयत्न भले
तुटपुंजे वाटतील;पण या छोट्या छोट्या प्रयत्नांनी
पर्यावरण रक्षणाचे मोठे कार्य केले आहे. 'पर्यावरण
समस्या ' या अंध:काराच्या विशाल पटलावर
आशेचे मंद दिवे मोठ्या धैर्याने, नेटाने प्रकाश
देत आहेत, मार्ग दाखवत आहेत.
   जेव्हा अशा प्रयत्नांचे हजारो, लाखो,करोडो
दीप उजळतील, तेव्हा पर्यावरण समस्या ही
'समस्या ' राहणारच नाही.  अर्थात त्याची सुरुवात
आपल्यापासून डोळसपणे व्हायला नको का  ?
   मी शेवटी एवढेच म्हणेन पर्यावरणाचा अभ्यास
करून सर्व बांधवांनी उद्याच्या "अंध:कारातील
मिणमिणते दीपक " व्हावे हीच मनीषा  !
     प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करूया.
  ||  जय पर्यावरण --जय वसुंधरा  ||

            लेखन :- शंकर चौरे
                       पिंपळनेर ता.साक्री जि.धुळे
                        📞 ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment